ऐतिहासिक कल्याण नगरीची सांस्कृतिक ओळख असलेल्या दुर्गाडी किल्ल्याच्या मालकीबाबत कल्याणच्या दिवाणी न्यायालयाने ऐतिहासिक निकाल दिला आहे. दुर्गाडी किल्ल्याची जागा ही राज्य शासनाच्याच मालकीची असल्यावर शिक्कामोर्तब करत या दुर्गाडी किल्ल्यावरील मुस्लिम संघटनेच्या मालकीचा दावा न्यायालयाने फेटाळल्याची माहिती सरकारी वकील ॲड.सचिन कुलकर्णी यांनी प्रसिध्दी माध्यमांना दिली.
कल्याण न्यायालयाच्या या निकालानंतर शिवसेना, भाजपसह अनेक हिंदुत्ववादी संघटनांनी या निर्णयाचे स्वागत करत संपूर्ण न्यायव्यवस्थेचे आभार मानले आहेत.
विशेष म्हणजे गेल्या साडेचार दशकांहून अधिक काळापासून दुर्गाडी किल्ल्याच्या मालकीबाबतचा हा खटला सुरू होता. याठिकाणी असणारे मुस्लिमधर्मियांचे प्रार्थनास्थळ असल्याचे सांगत मुस्लिम समुदायाच्या वतीने मजलिस ए मुशायरा ट्रस्टकडून दुर्गाडी किल्ल्याच्या जागेवर मालकी हक्क सांगण्यात आला होता. मात्र कल्याण न्यायालयातील वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश ए. एस. लांजेवार यांनी मजलिस ए मुशायरा ट्रस्टकडून मुदतबाह्य कालावधीत हा दावा दाखल करण्यात आल्याचे सांगत त्यांचा मालकी हक्क फेटाळून लावला. आणि दुर्गाडी किल्ल्याची जागा ही शासनाच्याच मालकीची असल्याच्या मुद्द्यावर शिक्कमोर्तब केल्याची माहिती सरकारी वकील ॲड सचिन कुलकर्णी यांनी दिली.
तर ही जागा शासनाच्या मालकीची असल्याने वक्फ बोर्डाने हा खटला आपल्याकडे चालवण्याचा दाखल केलेला दावाही फेटाळला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान न्यायालयाच्या या महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक निकालाचे भाजपचे माजी मंत्री आणि आमदार रविंद्र चव्हाण, शिवसेना कल्याण शहरप्रमख रवी पाटील, यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून कायदेशीर लढा देणारे हिंदुत्ववादी संघटनेचे दिनेश देशमुख,पराग तेली यांच्यासह अनेकांनी स्वागत केला आहे. तसेच शिवसेना जिल्हाप्रमुख अरविंद मोरे आणि शहरप्रमुख रवी पाटील यांच्या नेतृत्वाखाली अनेक शिवसैनिकांनी दुर्गाडी किल्ल्यावरील देवीच्या मंदिरात आरती करत या निकालाचे स्वागत केले.
0 Comments