नवी दिल्ली दि.११ फेब्रुवारी :
काँग्रेस पक्ष हा राजकारणातला भस्मासूर आहे. काँग्रेसने ज्यांच्या डोक्यावर हात ठेवला ते भस्म झाले, असा घणाघात शिवसेना संसदीय पक्षाचे गटनेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आज लोकसभेत केला. केंद्रीय अर्थसंकल्पावर खासदार डॉ. शिंदे यांनी शिवसेना पक्षाच्या वतीने आपली भूमिका मांडली. मध्यमवर्गाला खूश करणारा बजेट सादर करुन अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी विरोध पक्षाला चेकमेट केले, अशा शब्दांत खासदार डॉ. शिंदे यांनी बजेटचे कौतुक केले.
ते पुढे म्हणाले की, काँग्रेसच्या भस्मासूराने महाराष्ट्रात ‘यूबीटी’ची मशाल विझवून टाकली तर घडाळ्याची स्थिती बिकट केली, अशी टीका खासदार डॉ. शिंदे यांनी यावेळी केली. ज्यांनी हिंदुत्व सोडले आणि बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी केली त्याची काय अवस्था झाली हे महाराष्ट्रात निवडणुकीतून दिसून आले, असा टोला खासदार डॉ. शिंदे यांनी लगावला. राहुल गांधी चीनच्या प्रवक्त्यांप्रमाणे भाषण केले. मेक इन इंडियांला शिव्या देणारे केवळ सरकारलाच नाही तर देशातील प्रत्येक कामगार, अभियंता, शास्त्रज्ञ, डॉक्टर्स यांना ते शिव्या देतात. या सर्वांच्या प्रयत्नांमुळेच मेक इन इंडिया यशस्वी झाले, असे खासदार डॉ. शिंदे म्हणाले. काँग्रेस सरकारच्या काळात बँकांची अवस्था बिकट झाली आणि ‘यूपीए’ कमी आणि ‘एनपीए’ची जास्त चर्चा झाली. बँकांना लुटण्याचे काम काँग्रेस सरकारने केले. मात्र या सर्व बँकांना ‘एनडीए’ सरकारने १० वर्षात एनपीएच्या दृष्टचक्रातून बाहेर काढले.
ते पुढे म्हणाले की, इंडि आघाडीत काँग्रेस हा एक असा बॅट्समन आहे जो आघाडीतील इतरांना रनआऊट करत आहे, असा टोला डॉ. शिंदे यांनी लगावला. यंदाच्या बजेटने विरोधी पक्षांची बोलती बंद केली. ‘एनडीए’ सरकार स्कीम्ससाठी ओळखली जाते तर काँग्रेस सरकार स्कॅम्ससाठी कुप्रसिद्ध होते. ते म्हणाले की, २०१४ मध्ये काँग्रेसने भारताला अधु अर्थव्यवस्था दिली होती. त्यावेळी भारताचं बजेट १७ लाख ९४ हजार कोटींचे होते. आज भारताचे बजेट ५० लाख ६४ हजार कोटींचे आहे. ज्यात ३९ लाख ४४ हजार कोटींचा महसुली खर्च आणि ११ लाख २१ हजार कोटींचा भांडवली खर्चाचा समावेश आहे. ‘एनडीए’च्या काळात भारत जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनली, असे ते म्हणाले.
#shrikantshinde
0 Comments