Hamara Mahanagar News

"संघर्ष काळातील एकनिष्ठ दुर्लक्षित राहणार असेल तर एकनिष्ठेचे फळ काय ?" उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख सदानंद थरवळ यांचा राजीनामापत्राद्वारे डागली पक्ष नेतृत्वाच्या धोरणांवर तोफ


डोंबिवली दि.24 ऑक्टोबर :
उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून काही दिवसांपूर्वीच पक्षात दाखल झालेल्या दिपेश म्हात्रे यांना डोंबिवली विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाली. त्यावरून नाराज झालेल्या जुन्या शिवसैनिक आणि विद्यमान जिल्हाप्रमुखाने एका पत्राद्वारे थेट उध्दव ठाकरे यांच्यावर तोफ डागत आमच्या एकनिष्ठतेचे हेच का फळ असा सवाल उपस्थित करत आपल्या पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.
उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आज आपली पहिली 65 उमेदवारांची यादी जाहीर केली. ज्यामध्ये डोंबिवलीतून दिपेश म्हात्रे यांच्या नावाचाही समावेश आहे. त्यावरून जुने शिवसैनिक अशी ओळख असलेल्या आणि पक्षामध्ये सध्या कल्याण लोकसभा जिल्हाप्रमुख असे महत्त्वाचे पद भूषवणाऱ्या सदानंद थरवळ यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. इतक्यावरच ते थांबले नाहीत तर एका पत्राद्वारे त्यांनी थेट पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनाच लक्ष्य केले आहे. 
आपल्यावर, आदित्य साहेबांवर अगदी खालच्या पातळीत बोलणारा पूर्वाश्रमीचा शिवसैनिक पक्षात परत आल्यावर त्याला लगेचच डोंबिवलीतून उमेदवारी मिळणार असेल आणि संघर्ष काळामध्ये सदैव एकनिष्ठ राहणारा शिवसैनिक दुर्लक्षितच राहणार असेल तर साहेब,या निष्ठेचे फळ काय ? असा आर्त सवाल सदानंद थरवळ यांनी उपस्थित केला आहे. तसेच आपण अत्यंत कठोर मनाने जिल्हाप्रमुख पद तसेच पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचे सांगत भविष्यात आमच्या निष्ठा आणि इमानावर हसतील अशा शब्दांत थरवळ यांनी आपली कैफियत मांडली आहे.

Post a Comment

0 Comments